प्लास्टिकचा वापर ही जागतिक समस्या - ॲड. नितीन ठाकरे
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मान्यवर
केटीएचएम कॉलेजमध्ये शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
नाशिक :- प्लास्टिकचा वापर ही जागतिक समस्या असून, त्यावर सर्वांनी एकत्रितपणे विचार करून पर्याय शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी जगभरातील विविध देशांमधील प्लास्टिक वापरामुळे होणाऱ्या भीषण परिणामांची माहिती दिली.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित ‘एक दिवसीय शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्णम इकोविजन या संस्थेच्या पूनम दोशी उपस्थित होत्या.
प्रमुख मार्गदर्शन सत्रात दोशी यांनी पावर पॉइंट प्रझेंटेशनद्वारे महाविद्यालयातील नेहमीच्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर कसा रोखता येईल, याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्याचप्रमाणे इको फ्रेंडली साहित्य वापरून अधिक सुंदर सजावट करता येते, हे देखील पटवून दिले. याप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी प्लास्टिकचा वापर बंद करावा व पर्यावरणाची हानी रोखावी, असे आवाहन केले.
या कार्यशाळेसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी विकास अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमात प्लास्टिक पाण्याची बाटली, प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिक डिजिटल बॅनर इत्यादी न वापरता पर्यावरणपूरक गोष्टी वापरल्या गेल्या. विद्यार्थी विकास मंडळाचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभारदेखील मानले.
Comments
Post a Comment