भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अन्न व पोषणविषयक विशेष प्रयोग करणार - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची घोषणा

भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आगामी `अ‍ॅक्सिअम मिशन 4` (एएक्स-4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अन्न आणि पोषणविषयक विशेष प्रयोग करतील, अशी माहिती, अंतराळ विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हे प्रयोग भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत आहेत. नासाच्या (एनएएसए) पाठबळासह हे प्रयोग विकसित करण्यात आले असून, अंतराळातील पोषणशास्त्र आणि दीर्घकालीन मानवी मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या स्वयंपूर्ण जीवन समर्थन प्रणालींच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की `अ‍ॅक्सिअम-4` मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे `मिशन पायलट` म्हणून काम पाहतील. त्यांच्या सोबत `मिशन कमांडर` म्हणून पेगी व्हिटसन (यूएसए, एनएएसएचे माजी अंतराळवीर), तसेच `मिशन स्पेशालिस्ट` म्हणून स्लावोश उज्नान्स्की-विश्न्येफ्स्की (पोलंण्ड/इएसए) आणि टिबोर कापू (हंगेरी/इएसए) सहभागी असतील.

ग्रुप कॅप्टन शुक्ला हे मानवी अंतराळ मोहिमेसाठी प्रशिक्षित झालेल्या भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या पथकातले सदस्य असून, ग्रुप कॅप्टन प्रसांत बालकृष्णन नायर हे त्यांच्यासाठी राखीव पर्यायी अंतराळवीर आहेत. `अ‍ॅक्स-4` मोहिमेचे व्यवस्थापन अ‍ॅक्सिअम स्पेसकडे असून, स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होणार आहे. ही मोहिम `आयएसएस`वरील भारताच्या पहिल्या वैज्ञानिक-अंतराळवीराच्या नेतृत्वाखालील जीवशास्त्रीय प्रयोगांची ऐतिहासिक सुरुवात ठरेल.

या उपक्रमांद्वारे भारत केवळ अंतराळात पोहोचत नाही, तर तिथे मानवी जीवन कसे टिकवायचे, मानवाने कसे सेवन करायचे आणि कसे जगायचे याचे भविष्य घडवत आहे. या प्रयोगांच्या यशामुळे अंतराळातील मानवी पोषणात क्रांती येऊ शकते आणि बंद वातावरणातील जैव-पुनर्वापर प्रणाली शक्य होऊ शकते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की ही मोहिम भारताचा जागतिक अंतराळ क्षेत्रातील वाढता प्रभाव अधोरेखित करते, तसेच प्रक्षेपण सेवा पुरवठादार या भूमिकेतून अंतराळ संशोधन, शाश्वतता आणि वैज्ञानिक नेतृत्व याकडे होणारी वाटचाल दर्शवते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला