आयएएस अधिकाऱ्यांच्या ई-बुक सिव्हील सूचीच्या प्रकाशनामुळे कागदावर आधारीत दस्तऐवजातून सुटका

आयएएस अधिकाऱ्यांच्या ई-बुक सिव्हील सूचीच्या प्रकाशनामुळे मोठ्या प्रमाणात कागदावर आधारीत दस्तऐवजातून सुटका झाली असून त्यामुळे सरकारी तिजोरीवर येणारा ताण कमी होऊन बचत साध्य होते : डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्‍ली :- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारतीय प्रशासकीय सेवा, अर्थात आयएएस अधिकाऱ्यांच्या सिव्हील सूची 2024 या ई-बुकच्या 69व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. ई-बुकच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनामुळे मोठ्या प्रमाणात कागदावर आधारीत दस्तऐवजातून सुटका झाली असून त्यामुळे सरकारी तिजोरीवर येणारा ताण कमी होऊन बचत साध्य होते असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
आयएएस अधिकाऱ्यांची माहिती माऊसच्या केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणे ही केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या सुधारणांच्या मालिकेची फलनिष्पत्ती असून मोदी सरकार 3.0 कार्यकाळातील सर्वात जलद कामगिरीपैकी एक आहे. सिव्हील सूची संदर्भात ई बुक प्रकारातील ही चौथी आवृत्ती आहे. आयएएस अधिकाऱ्यांची सिव्हील यादी प्रकाशित करायला 1960 पासून सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितले.

ही सूची म्हणजे सरकारला देशाच्या विविध भागातील सर्वोत्कृष्ट अधिकारी निवडण्यासाठीचे आणि अधिकाऱ्यांना भविष्यातील संधी शोधण्यासाठीचे समान आणि व्यापक व्यासपीठ आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

यामुळे अधिक वस्तुनिष्ठ अभिप्रायासह प्रतिभासंपन्न अधिकाऱ्यांमधून उत्तम आणि योग्य अधिकारी निवडण्यासाठीचे सरकारचे क्षितीज विस्तारेल आणि अशा प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या कामकाजाचा अनुभव आल्याने त्यांच्या संधी मर्यादित न राहता त्यांना प्राधान्य दिले जाईल आणि मनुष्यबळ तसेच ज्ञान संसाधनांचे संचित तयार होईल, असेही ते म्हणाले.  

केंद्र सरकार आणि अधिकारी या दोघांसाठी ही सारखीच लाभदायक स्थिती असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले. प्रशासनात अधिक चांगल्या आणि माहितीपूर्ण निवडी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटाच्या वापराचा समन्वय याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. सरकारच्या कामात सुलभता आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांनी भर दिला.

आपण सर्व जण मिशन कर्मयोगी सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "किमान सरकार -कमाल प्रशासन' या दूरदृष्टीनुसार मार्गक्रमण करत आहोत आणि 2047 मध्ये अमृत काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीला चालना देत आहोत. त्यांच्या मते, नागरिक केंद्रित सुधारणा, सुशासनासह पारदर्शकता हा मोदी सरकार 3.0 मधील सुधारणांचा पाया आहे, असे मंत्री म्हणाले.

यासोबतच डॉ. जितेंद्र सिंह यांनी सध्या सहाय्यक सचिव म्हणून प्रशिक्षण घेत असलेल्या 2022 च्या तुकडीच्या आयएएस प्रोबेशनर्सशी देखील संवाद साधला.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन