रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रीय हरित सेनेचा अनोखा उपक्रम ‘खऱ्या रक्षकांना राखी’
नाशिक :- रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) च्या विद्यार्थिनींनी एक आगळीवेगळी सामाजिक आणि पर्यावरणपूरक भूमिका बजावत, पंचवटी पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना स्वतः हाताने तयार केलेल्या "टाकाऊतून टिकाऊ" राख्या बांधून त्यांचा सन्मान केला. विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधताना "आपण आमचे खरे रक्षक आहात" असा आदरभाव व्यक्त केला. उपस्थित पोलीस बांधवांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत म्हणाले, रक्षाबंधन हे एकमेकांच्या रक्षणाचे वचन असते. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. कोणतीही अडचण आली, तर आमच्याशी कधीही संपर्क करा – आम्ही तत्पर आहोत. या प्रेरणादायी उपक्रम प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक कौतुक केले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव, सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार मुश्रीफ शेख, पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, शरद ठाकरे, तसेच पोलीस कर्मचारी अस्तिक गायकवाड, राजेश महाले, श्रीकांत साळवे, चितळकर, रोहिणी उगले, रोहिणी सवंद्रे, रोहिणी साबळे, स्वाती फड,आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक किशोर झोटिंग आणि पर्यवेक्षिका शुभदा टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यासाठी क्रीडाशिक्षक अरुण जाधव, प्रदीपसिंग पाटील,मनीषा पवार यांनी कामकाज पाहिले. या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी केवळ एक राखी बांधून औपचारिकता पार पाडली नाही, तर त्यांनी रक्षण करणाऱ्या खऱ्या रक्षकांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश दिला. राख्यांचे टाकाऊतून टिकाऊ निर्मिती ही पर्यावरण संवर्धनाचे भान ठेवणारी जाणीवही ठरली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवेचे, देशप्रेमाचे आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले.
Comments
Post a Comment